
फलटण : भारताला मेरीटाईम पॉवर बनवणारा वाढवण बंदर जसे देशातील सर्वोत्तम ‘ऑफ शोअर पोर्ट’ होणार आहे त्याचप्रमाणे ‘ऑफ शोअर एअरपोर्ट’ मुंबईत बनवणार असून जो मुंबईतील तिसरा एअरपोर्ट असेल याचे काम लवकरच सुरू होईल. राज्यात सध्या २४ जिल्ह्यांमध्ये एअरपोर्ट आणि धावपट्टीची सुविधा आहे. अगामी कालावधीत ३० जिल्ह्यामध्ये या सुविधा वाढवत आहोत अशी स्पष्टॊक्ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
हॉटेल ताज लँडस एंड बांद्रा, मुंबई येथे केंद्रीय नागरी हवाई मंत्रालय मार्फत आयोजित वेस्टन रीजन मिनिस्टर कॉन्फरन्सचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी केंद्रीय नागरी हवाई मंत्री के. राममोहन नायडू, केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, गोवाचे पर्यटन मंत्री रोहन कुंटे, गुजरातचे नागरी हवाई मंत्री बलवंत सिंग राजपूत, मध्य प्रदेशचे वाहतूक परिवहन मंत्री उदय प्रताप सिंग, केंद्रीय नागरी वाहतूक मंत्रालयाचे सचिव समिर कुमार सिन्हा आदींची उपस्थिती होती.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, भारत ही जगात सर्वात वेगाने विकसित होत असलेली अर्थव्यवस्था आहे. जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था म्हणून उदयास येत आहे.भारताला विकासाकडे नेणारी रोबोस्ट एव्हिएशन इकोसिस्टीमची अत्यंत आवश्यकता आहे. काही वर्षापर्यंत विमान सेवा हा फक्त केंद्रांचाच विषय आहे असं वाटत होते, पण आता परिस्थिती बदलली आहे, जे राज्य विमान वाहतूक हा विषय प्राधान्याने बघणार नाही ते प्रगतीत मागे पडेल त्यामुळे हा विषय सर्वांसाठीच महत्वाचा ठरला आहे. राज्यात ग्रीन फील्ड आणि ग्राउंड फिल्ड विमान वाहतुकीला पूरक अशी सर्व सुविधा तयार करत आहोत. यासाठी मनुष्यबळाची अत्यंत आवश्यकता आहे, त्यासाठी आम्ही तयार आहोत. राज्यात सध्या २४ जिल्ह्यांमध्ये एअरपोर्ट आणि धावपट्टीची सुविधा आहे. या सुविधा आगामी कालावधीत ३० जिल्ह्यामध्ये वाढवत आहोत. धावपट्ट्या अजून अपग्रेड करत आहोत. रात्री विमान उतरवण्याची सुविधा निर्माण करणे. एक एअरपोर्ट उद्योजकांना व गुंतवणूकदारांना मोठ्या प्रमाणात आकर्षित करत असतो. गडचिरोली सारख्या दुर्गम जिल्ह्यामध्ये नवीन एअरपोर्ट बनवणार आहोत त्याचा प्रस्ताव केंद्र शासनाला सादर केला आहे. गडचिरोली मध्ये दीड लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे यामध्ये वाढ होऊन ती दहा लाख कोटी पर्यंत वाढेल अशी अपेक्षा व्यक्त करून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, नवी मुंबई एअरपोर्टचे काम ९० च्या दशकामध्ये सुरू झाले. या कामाला विविध परवानगींची आवश्यकता होती. या विविध परवानगी घेण्यासाठी पंधरा वर्षे लागले त्या सात परवानग्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी एकाचवेळी दिल्या. नवी मुंबई एअरपोर्ट आम्ही लवकर सुरू करत आहोत. या एअरपोर्ट आणि अटल सेतूमुळे खूप मोठ्या प्रमाणात प्रगतीला हातभार लागणार आहे. मुंबईपेक्षा तिपटीने मोठी असलेली मुंबई या परिसरात वसणार आहे. २०३० पर्यंत महाराष्ट्राला ट्रिलियन डॉलर इकॉनोमी राज्य बनवणार आहोत.
केंद्रीय वाहतूक मंत्रालय लवकरच ‘उडान यात्री कॅफे’ सुरू करणार
सर्व सामान्य माणसाचे जीवन सुसह्य करणारे निर्णय केंद्रीय विमान वाहतूक मंत्रालय घेत आहे.
विमान वाहतूक क्षेत्रात केंद्र व राज्य यांच्या समन्वयासाठी नोडल अधिकारी नेमणार असून केंद्र शासन लवकरच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकार झालेले ‘उडान यात्री कॅफे’ सुरू करणार आहे. सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात जेवण मिळावे यासाठी हा निर्णय खूप महत्वाचा असल्याचे केंद्रीय नागरी हवाई मंत्री के.राममोहन नायडू यांनी यावेळी स्पष्ट केले.
विमान वाहतूक सेवा अधिक गतीमान करणार
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सर्व सामान्य व्यक्तींचे विमानात बसण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी उडाण योजना राबविण्यात येत आहे. केंद्र व राज्याच्या समन्वयातून पश्चिम क्षेत्रातील राज्यांचे विमान वाहतूक क्षेत्रातील प्रश्न प्राधान्याने सोडवून विमान वाहतूक सेवा अधिक गतीमान करणे हे केंद्र शासनाचे ध्येय असल्याचे यावेळी केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्रीय नागरी वाहतूक मंत्रालयाचे सचिव समिर कुमार सिन्हा यांनी केले. यावेळी विमानसेवा कालावधीत आपत्कालीन प्रशिक्षण विषयक भारतीय विमानपत्तन प्राधीकरण तर्फे लिखीत ‘फुल स्केल एर्मजन्सी मॉक ड्रील्स प्रिपेंरिंग एअरपोर्टस फॉर दि अनएक्सपेक्टेड’या पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
