
फलटण : जुन्या गाडयांमधून प्रवास करताना प्रवाशांना अनेक अडचणींना, त्रासाला सामोरे जावे लागत असताना चुप्पी साधणारे लोकप्रतिनिधी डेपोत नवीन एसटी बसेस आल्यानंतर मात्र त्यांचे श्रेय घेऊन त्यांचे उदघाटन करीत असल्याचे दृष्य राज्यभारत ठिकठिकाणी पाहवयास मिळत आहे. काही ठिकाणी लोकप्रतिनिधीनी स्वतः या बसेस चालविल्याचे दिसून आले आहे, परंतु हा प्रकार अपघाताला निमंत्रण देणारा असल्याने याबाबत राज्यातील आगार प्रमुखांना योग्य त्या दक्षता घेण्याबाबतच्या सूचना देण्यात याव्यात अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघाचे राज्याध्यक्ष रणजित श्रीगोड यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघाच्यावतीने रणजित श्रीगोड यांनी राज्य परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेली तीन वर्षे राज्य सरकारकडून नवीन बस खरेदी बाबत धोरण चुकल्याने, जुन्या खराब बस चालविणे हा एस टी महामंडळाचा नाईलाज होता. जुन्या व दयनीय अवस्थेतील गाडयांमधून प्रवास करताना प्रवाशांना अनेक अडचणींना, त्रासाला सामोरे जावे लागत असताना लोकप्रतिनिधी मात्र गप्प होते. परंतु आगाराला नवीन बसेस देण्यात आल्यानंतर प्रत्येक लोकप्रतिनिधी आपल्या डेपोमध्ये आलेल्या नवीन बसेसचे श्रेय घेत असल्याचे दृष्य आहे.

पूर्वी प्रवास करताना प्रवाशांचे हाल होत असताना व बसेसच्या अवस्थेबाबत गप्प बसणारे आता नवीन एसटी बसेसची उदघाटने करीत आहेत. काही ठिकाणी लोकप्रतिनिधी या नवीन बसेस स्वतः चालवीत असल्याचे व्हीडीओ समाज माध्यमावर दिसून आले आहेत. वास्तविक नवीन तंत्राचा समावेश असणाऱ्या या बसेस चालविताना चालकांनाही विशेष काळजी घ्यावी लागते, त्यामुळे लोकप्रतिनिधी यांनी या बसेस चालविण्याचा प्रकार अपघाताला निमंत्रण देणारा असल्याचे म्हटले तरी ते वावगे ठरणार नाही. लोकप्रतिनिधी असल्याने स्थानिक अधिकारीही त्यांना रोखू व बोलू शकत नाहीत. प्रशिक्षित चालकांव्यतिरिक्त अन्य कोणी बसेस चालविणे योग्य आहे का असा सवाल व्यक्त करून परिवहन मंत्री यांच्या लेखी परवानगीने आपण राज्यातील सर्व आगार प्रमुखांना या बाबत योग्य ती दक्षता सूचना द्याव्यात अशी मागणी निवेदनामध्ये करण्यात आली आहे.

