फलटण शहरातील विविध प्रश्नांवर राष्ट्रीय काँग्रेचे निवेदन

फलटण : फलटण शहरातील स्व.यशवंतराव चव्हाण व त्यांच्या सुविद्य पत्नी स्व.वेणुताई चव्हाण यांचा संयुक्त पुतळा परिसराची दुरावस्था दूर करावी तसेच अन्य मागण्याचे निवेदन राष्ट्रीय काँग्रेसच्यावतीने फलटण शहर अध्यक्ष पंकज पवार यांनी फलटण नगरपरिषद चे उपमुख्याधिकारी तेजस पाटील यांना दिले.
राष्ट्रीय काँग्रेस चे प्रदेश प्रतिनिधी डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) यांच्या मार्गदर्शनाखाली व राष्ट्रीय काँग्रेस चे तालुकाध्यक्ष महेंद्र सूर्यवंशी (बेडके) यांच्या सुचनेनुसार देण्यात आलेल्या निवेदनात खालील मुद्द्यांचा समावेश आहे.
यशवंतराव चव्हाण पुतळा परिसर दुरावस्था – फलटण शहराचे प्रवेशद्वार असलेल्या जिंती नाका येथे देशाचे माजी उपपंतप्रधान व महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व.यशवंतराव चव्हाण साहेब व त्यांच्या सुविद्य पत्नी स्व.वेणुताई चव्हाण यांचा संयुक्त पुतळा आहे. सदर पुतळा व सभोवताली असणाऱ्या संरक्षक भिंतीची पडझड होऊन दुरावस्था झालेली आहे. याबाबत राष्ट्रीय काँग्रेस फलटणच्या वतीने प्रशासनास अनेक वेळा प्रत्यक्ष भेटून निवेदने दिलेली आहेत. वास्तविक फलटण हे स्व.वेणुताई चव्हाण यांचे माहेर असून समस्त फलटण वासियांना याचा अभिमान आहे. १२ मार्च रोजी स्व. यशवंतराव चव्हाण यांची जयंती असते, यावेळी फलटण तालुक्यातील अनेक संस्था, नागरिक तेथे अभिवादन करण्यासाठी येत असतात. त्यावेळी या परिसराची झालेली पडझड तसेच तेथे असलेला कचरा व गुटखा व मद्याच्या रिकाम्या बाटल्या व येथील दुरावस्था पाहून सर्वांचे मन व्यथित होते. वरील सर्व परीस्थिती पाहता आपण याची दखल घ्यावी व सदर स्मारकाची व संरक्षक भिंतीचे तातडीने सुशोभीकरण करावे अशी मागणी करण्यात आली आहे.
पर्यायी मार्गाने वाहतूक वळवा
फलटण शहरातून होणाऱ्या वाहतुकीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. क्रांतिसिंह नाना पाटील चौक येथे वाहतूक खोळंबून वाहनाच्या मोठ्या रांगा लागणे हे चित्र नित्याचे झाले आहे. या परिसरात सातत्याने छोटे मोठे अपघात होत असतात, त्यामध्ये अनेकदा जिवितहानी देखील झाली आहे. त्यामुळे या चौकातील वाहतुकीचा बोजा कमी करण्यासाठी बारामती पुल ते श्रीराम कारखाना मार्गे मार्केट यार्ड कडे जाणाऱ्या रस्त्याचा वापर करून जड वाहनासह अन्य वाहतूक वळवणे आवश्यक आहे.
सिग्नल यंत्रणा सुरु करा
क्रांतिसिंह नाना पाटील चौक येथे सिग्नल यंत्रणा बसवलेली आहे, मात्र ती अनेक वर्षे बंद अवस्थेत असल्याने रोजच वाहतूकीची कोंडी होत असते, त्यातच काही अवजड वाहने, उसाच्या ट्रॉल्या, ट्रक चुकिच्या बाजूने वळण घेत असतात. यातच एखादा गंभीर अपघात होण्याची शक्यता आहे, यामुळे येथील वाहतूक सुरळीतपणे सुरु राहावी व अपघातांचे प्रमाण कमी व्हावे यासाठी तातडीने येथील सिग्नल यंत्रणा चालू करण्यात यावी.
त्यांच्यावर कारवाई करावी
शहरातील अनेक मुख्य रस्त्यावर नवीन व्यापारी संकुल झालेली आहेत. सदर व्यापारी संकुलात पार्किंग नाही, त्यामुळे तेथील दुकानात येणारे ग्राहक रस्त्यावर आपली वाहने उभी करतात, यामुळे वाहतुकीचा खोळंबा होत आहे. याबाबत संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी. तसेच फलटण नगरपरिषदेच्या माध्यमातून फलटणकर नागरिकांना सुविधा मिळणेबाबत संबंधित विभागांना आपल्या माध्यमातून योग्य सुचना द्याव्यात.
सदर निवेदन देते वेळी जिल्हा काँग्रेस चे उपाध्यक्ष शंकरराव लोखंडे व फलटण शहर अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष अल्ताफ पठाण आदींची उपस्थिती होती.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!